गोविंद दळवीचा 'कैची-कंगवा' व्यवस्थेची 'हजामत' करतो तेंव्हा.....

गोविंद दळवीचा 'कैची-कंगवा' व्यवस्थेची 'हजामत' करतो तेंव्हा... 
     दिवस,१४ एप्रिल २०१८... वेळ, दुपारची असेल कोणती तरी... सोलापुरातील बैठका, सभा संपवून बाळासाहेबांना तातडीने अकोल्याकडे निघायचं होतं... बाळासाहेबांची वाट पहात हेलिकॉप्टर सोलापुरच्या 'त्या' हेलिपॅडवर उभं होतंय. तिकडे निघायच्या ठिकाणावर बाळासाहेबांनी एका कार्यकर्त्याच्या कानात 'हळूच' काही तरी सांगितलं... अन एकच शोधाशोध सुरू झाली.... गोविंद दळवीला शोधा?... जो-तो गोविंद दळवीला शोधू लागला?... प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता... साहेबांनी गोविंद दळवीला का शोधायला सांगितलं?... अखेर आजूबाजूला कुठं तरी गोविंद दळवी सापडला... अन त्याला साहेबांसमोर नेण्यात आलं... गोविंदलाही कळत नव्हतं. त्यालाही एकच प्रश्न पडला होता... साहेबांनी आपल्याला का बोलावलं असेल?. 'तो' काहीसा घाबरा-घुबरा होतच साहेबांजवळ आला. साहेब त्याला म्हणालेत, "गोविंद!, चल गाडीत बस. आपल्याला हेलिपॅडकडे निघायचे आहे. आपण हेलिकॉप्टरने अकोल्याला जातो आहे. 

    गोविंदला काहीच कळत नव्हते. गोविंदला एरव्ही बसशिवायचा प्रवासच माहित नव्हता. आज थेट हेलिकॉप्टरची सफारी घडणार होती. अन तीही थेट बाळासाहेब आंबेडकरांसोबत... त्याला जगण्याचं बळ देणाऱ्या त्याच्या बाबासाहेब आंबेडकर या 'वैचारिक बापा'च्या रक्ताच्या आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्या नातवासोबत... गोविंदला काहीच सुचत नव्हतं... तो काहीसा भांबावलेल्या अवस्थेतच बाळासाहेबांच्या गाडीत बसला... गाडी अत्यंत वेगाने 'हेलिपॅड'कडे निघाली... इकडे बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकाच गोष्टीचं कुतूहल अन चर्चा होती... नांदेडच्या कुणी तरी गोविंद दळवी नावाच्या सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्याला आज बाळासाहेबांनी आपल्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसवलं.

    इकडे हेलिकॉप्टरनं सोलापूरच्या हेलिपॅडवरून अकोल्याकडे 'झेप' घेतली. परंतू, गोविंदचं भांबावलेपण अजुनही संपलेलं नव्हतं... तितक्यात बाळासाहेबांनी त्याला अगदी सहजपणे म्हटलं, "काय रे गोविंद!, कसं सुरू आहे तुझं काम?. गावाकडे घरचे कसे आहेत?. घरी कोण-कोण असतं?". तुझं घर कसं चालतं?. उदरनिर्वाहासाठी काय काम करतो?... एव्हढा मोठा नेता बापाच्या मायेनं एव्हढ्या आपुलकीनं आपल्याबद्दल विचारतो हे ऐकूनच त्याला गलबलून आलं... हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर 'हवेत' हा आपल्या कार्यकर्त्याचं जमिनीवरचं वास्तव जाणून घेणारा नेता पाहून गोविंदचे डोळे डबडबलेत. त्यानं सर्व कौटूंबिक 'वास्तव' बाळासाहेबांना सांगितलं. त्यानंतर पक्षसंघटना, पक्षबांधणी, भविष्यात वंचितांच्या चळवळीच्या वाटचालीवरही दोघांची चर्चा रंगत गेली. तितक्यात अकोला आलं. 

   अकोल्याच्या शिवणी विमानतळावर हेलिकॉप्टर 'लँड' झालं. आतापर्यंत चळवळीबद्दल बाळासाहेबांसोबत 'हवेत' झालेल्या चर्चेला आता गोविंदला 'जमिनी'वर प्रत्यक्षात उतरवायचं होतं. अन बाळासाहेब नावाच्या परिसाच्या स्पर्शानं आपल्यातील कार्यकर्त्याचं अन संवेदनेचं सोनं करायचं अशी शपथच त्यानं जणू त्या दिवशी आपल्या मनाशी घेतली. त्याला बाळासाहेबांनी अकोल्यातून निरोप दिला. अन त्यानं तिथून थेट अकोल्याचं बस स्टँड गाठलं. अन नांदेडकडे जाणारी बस पकडली. अगदी तासभरापुर्वी हेलिकॉप्टरमध्ये 'आकाशा'त असलेला गोविंद तासाभरानंतर बसने नांदेडकडे निघाला होता. परंतू, त्याला ना हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा माज होता, ना बसमध्ये बसल्याची खंत... त्याच्यात बसमधून नांदेडकडे निघतांना फक्त एक मोठं समाधान होतं... ते समाधान होतं 'बाळासाहेब' नावाचा राजकारणातला नवा 'प्रकाश' गवसल्याचं. याच 'प्रकाशवाटे'तून वंचितांसाठी नवा 'राज'मार्ग शोधण्याचा निश्चय त्यानं मनोमन केला होताय. बाळासाहेबांनी राजकारणाच्या गावकुसाबाहेर असलेल्या न्हावी समाजातील गोविंद दळवीला दिलेली ही दुसरी संधी... याआधीची पहिली संधी मिळाली होती ती नांदेडच्या सभेत वक्ता म्हणून बोलण्याची... 

      गोविंद दळवी... नांदेड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला न्हावी समाजातील वैचारिक युवक कार्यकर्ता... गोविंदनं बालपणापासून गरिबीचे चटके सोसलेले. लोकांच्या शेतात मजूर म्हणून ढोर-मेहनत केलेली. कळत्या वयापासून आपला पिढीजात व्यवसाय करीत कैची-कंगव्याशी मैत्री केली. सलुनचं दुकान टाकायची परिस्थिती नसल्यानं कधी पोत्यावर बसून कटींग-दाढी करायची. तर कधी 'धोपटी' घेऊन घरोघरी जावून हजामती करायच्या. दोन दशकांपुर्वी ग्रामीण भागात न्हाव्याला फारसं आदराचं स्थान नसायचं. त्याही परिस्थितीत गोविंदमधला कार्यकर्ता, संवेदनशील माणूस घडत होता. 

   त्याला घडवलं ते पुस्तकांनी... कटींग-दाढी करतांना ग्राहक नसले की तो पुस्तकं वाचायचा. पुस्तकातून त्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज भेटलेत. याच महापुरूषांनी त्याची वैचारिक जडण-घडण केली. यातूनच तो २००७ पासून सामाजिक चळवळीत ओढला गेला. अन २०१८ मध्ये त्याचा संबंध प्रकाश आंबेडकरांच्या चळवळीशी आला. तो प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय चळवळ आणि मांडणीनं झपाटून गेला. तो आंबेडकरांच्या प्रत्येक सभेत, आंदोलनात हिरीरीनं सहभागी होवू लागला. अन त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडला तो नांदेडच्या 'त्या' सभेत... 

   १७ जानेवारी २०१८... नांदेडमधील नवा मोंढा मैदान लोकांच्या गर्दीनं अगदी फुलून गेलं होतं. या सभेला प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी संबोधित करणार होते... अन तितक्यात व्यासपीठावरून भाषणासाठी 'गोविंद दळवी' हे नाव पुकारण्यात आलं... भाषणासाठी आयोजकांनी दिलेला वेळ होता फक्त सात मिनिटांचा... गोविंद 'त्या' विराट जनसमुदायापुढे उभे राहिलेत... अन त्यानंतर गच्च भरून आलेलं आभाळ बरसावं तसं गोविंदची वाणी बरसत होती. लोकांच्या टाळ्यांनी अक्षरश: मैदानाचं आकाश दणाणून गेलं. सात मिनिटांचे वीस मिनिट झाले तरी लोकं त्यांना 'माईक' सोडू देत नव्हते. गोविंदनं आज सर्वार्थानं मैदान जिंकलं होतं... 'माईक'कडे जातांना 'तो' गोविंद दळवी होता. मात्र, 'माईक' सोडून परत येतांना तो प्रकाश आंबेडकरांच्या चळवळीची 'मुलूखमैदान तोफ' झालेला होता. गोविंद दळवींची ओळख प्रकाश आंबेडकरांच्या चळवळीत एक आक्रमक, अभ्यासु आणि शिस्तबद्ध वकृत्वशैलीचा वक्ता म्हणून झाली होती. बाळासाहेब आंबेडकर यांनी गोविंद दळवी यांच्यातील कर्मठ, कृतीशील आणि निष्ठावान कार्यकर्ता ओळखला होता. तो आता सभा गाजवायला लागला होता. ही मुलूख मैदानी तोफ पुढे पक्षाच्या मुंबईतील शिवाजी पार्कवरील जाहीर सभेपासून महाराष्ट्राच्या गल्ली-बोळातील सभेत निनादू लागली. 

    यानंतर गोविंद दळवींची नोंद राज्यातील वंचित बहूजन आघाडीच्या नेत्यांमध्ये गणली जावू लागली. पुढे त्यांना वंचित बहूजन आघाडीचं प्रवक्तेपद दिलं गेलं. सभेतील प्रेक्षकांचा कल, आवाजातील आणि विचारातील स्पष्टता, विषयाचे सखोल ज्ञान, अचुक मांडणी, परिस्थितीची टायमिंग आणि शब्दांवर असलेली पकड या सर्व गुणांमुळे गोविंद दळवीची भाषण गाजत गेली. यामुळे लोकसभा निवडणुक प्रचारात स्टार प्रचारक म्हणून दुसरी नियुक्ती झाली. या निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रचारसभांचा राज्यभरात धुरळा उडवला. पक्षाचा त्यांच्यावरचा विश्वास वाढत गेला. त्यांना पुढे पक्षाचं राज्याचं महासचिवपद बहाल केलं गेलं. अन पुढे पक्षात अतिशय महत्वाच्या असलेल्या उपाध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागली. हा संपुर्ण सन्मान होता त्यांच्यातील निष्ठेचा, समर्पणाचा अन चळवळीवरच्या श्रद्धेचा... आज वंचित बहूजन आघाडी या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून गोविंद दळवींचं काम अतिशय उत्तमपणे सुरू आहे. 

      एरव्ही पत्रकार म्हणून राजकीय व्यक्तींवर लिहिण्याचं मी कटाक्षानं अन कायम टाळतो. कारण, राजकीय व्यक्तीमत्वांवर समाजात अनेक मत-मतांतरं असू शकतात. मला त्यात फारसं स्वारस्य नसतं. मात्र, मला गोविंद दळवी या कार्यकर्त्याचा प्रवास फार आश्वासक वाटतो. कारण, तो राजकारणाच्या अन राजकीय नेत्यांच्या कोणत्याच प्रचलित व्याख्येत बसत नाही. एरव्ही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर फारशा दखलपात्र नसलेल्या 'न्हावी' या वंचित समाजातून ते आले आहेत. त्यातही नेतेपदाची ओळख मिळेपर्यंत ते आपली 'धोपटी' घेत घरोघरी हजामती करायचं काम करायचे. आजही चळवळ सांभाळून ते त्यांचा व्यवसायही सांभाळत आहेत. 

  घरची परिस्थिती, पैसै नसतांना वक्ता, नेता अशी ओळख मिळाल्याचे अलिकडच्या राजकारणात फार कमी उदाहरणं आहेत. त्यामूळे राजकारणाच्या वाळवंटात 'गोविंद दळवी' यांचं नेतेपदाच्या रांगेत येणं आश्वासकतेची 'हिरवळ' आहे. माझा त्यांचा राजकीय विचार, त्यांची मतं यासोबत काहीही संबंध नाही. मात्र, जो संबंध आहे तो संवेदनेचा... सर्वसामान्य तरूणही राजकारणात येऊन यशस्वी होऊ शकतात या नव्या उमेदीच्या नव्या पालवीचा. आज याच लढवय्या अन सर्वार्थाने वंचितांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे... गोविंददादा!, सर्वार्थाने खुप-खुप मोठे व्हा, वंचितांचा आवाज बनत तुमच्या विचारांची तोफ अशीच चौफेर धडाडू द्या... वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा... 

@उमेश अलोणे
    अकोला 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे